उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सामाजिक सप्ताहांतर्गत तिसरे वैचारिक पुष्प ‘समते विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार’ या विषयावर सदाशिवराव कुलकर्णी यांचे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य अजय दंडवते, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. एन. हल्लाळे तसेच एस. जी. कोडचे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मस्के यांनी केले. आपल्या व्याख्यानात सदाशिवराव कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सखोल मांडणी करताना सांगितले की, “बाबासाहेबांचे कर्तृत्व अथांग समुद्रासारखे आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला.” ते पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटक हा साखळीतील कडीप्रमाणे समान ताकदीचा असणे आवश्यक आहे, तेव्हाच खरी सामाजिक समता निर्माण होते. धर्मांतर करण्यापूर्वी बाबासाहेबांनी सर्व धर्मांचा अभ्यास करूनच समानतेचे तत्त्व तपासले आणि त्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. भारतीय राज्यघटनेत समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा समावेश करताना भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धर्मांतराचा मुख्य हेतू बंधुत्वाची भावना दृढ करणे हा होता, ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला बौद्धिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळेल. चवदार तळे सत्याग्रह आणि काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनाचा उद्देश हा समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय आणि सर्व ठिकाणी समान प्रवेश मिळावा, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर सर्वांचा समान हक्क असावा हा होता, असेही त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, समाजातील असमानता दूर करणे म्हणजेच समानतेचे तत्व स्वीकारणे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे यांनी मानले. शेवटी, समानतेचे तत्त्व रुजवताना समाजातील ‘आपला-परका’ हा भेदभाव नष्ट होऊन सर्वांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयगिरीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. महाराष्ट...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
-
उदगीर - महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश महादप्पा मुद्दा यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या उपाध्यक्ष...
-
उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील फेब्रुवारी 2026 परीक्षेतील बारावीच्या विविध शाखांच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश सं...
No comments:
Post a Comment